गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

कविता - नदी हरवते शहरातून

 नदी हरवते शहरातून

हळूहळू ओढेही बुजती

मोजती मासे घटका

दूषित पाणी अन् माती


सांडपाणी आणि कचरा 

आवळती  रोजच गळा 

जन म्हणती माता-देवी 

आणिली  उतरती कळा   

नदी हरवते शहरातून...  


पक्ष्यांची घरटी होती

ती झाडे तोडली कोणी

एकेक प्रकल्पामागे

मुरतेच वेगळे पाणी

नदी हरवते शहरातून...


या सिमेंटी विकासाने 

नित पारा चढता राही 

का घटती घटती होते  

त्या नदीतटी वनराई 

नदी हरवते शहरातून..

कवी ग्रेस आणि पं. हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्याबद्दल आदर व्यक्त करून ... जे उघड्या डोळ्यांना दिसतं आणि मनापासून वाटतं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ तंबोऱ्यावर प्रियदर्शन सहस्रबुद्धे  भावपूर्ण गायला आहे. चैतन्य केतने दृश्य माध्यमातून वास्तव समोर ठेवलं आहे.
सहजच, स्क्रोल करत करत किंवा घाईघाईने ऐकाय-बघायचं हे गाणं नाही. वेळ आणि लक्ष देऊन, शांततेत, आपण स्वतःशीच प्रामाणिकपणे समजून घ्यायचं हे गाणं आहे. कदाचित, आपण नदीशी जोडले जाऊ. कदाचित, खोलवर काही जाणवेल. कदाचित . ...