मनात येईल ते
रविवार, ३ मे, २०२६
कविता - शोक
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
कविता - आरशांचा महाल
वादळासारखं नाही घुसत ते
गडगडाट, कडकडाट करत नाही
धुक्यासारखं हळूहळू पसरत असतं
आपण गाढ साखरझोपेत
जाग येते तेव्हा सगळं धूसर दिसतं
आपला उजेड झाकोळलेला
आपला रस्ता बुडालेला
आधी नुसती कुजबूज असते
"हे विकलेले, ते फितूर"
मग रोज येतात कथनं
मित्रांकडून, शेजाऱ्यांकडून
लिहून आलं म्हणजे खरं असणार
चित्र आहे म्हणजे तथ्य असणार
मग आवाज वाढत जातो
मोठमोठ्याने घुमू लागतो
माध्यमांमधून, रस्त्यावरून
घडी बसलेल्या व्यवस्थांमधून
सगळा भोवताल होयबाची वाडी
आरशांच्या महालात एकच एक चेहरा
चारी बाजूंना प्रतिध्वनी, प्रतिबिंब
भोवळ आणणारा चमचमाट, झगमगाट
आपला चेहरा हरवलेला
आतला हुंकारही ऐकू येत नाही
शोधायची धडपड कराल का?
मोकळं आकाश मागाल का?
तुमच्या कपाळी "कारस्थान" असं लिहिलं जाईल
तुमच्या द्रोहाचे नगरात फलक उभे राहतील
भव्य मंदिर अजूनही उभं आहे,
त्यावर कुठलाच घाव नाही
एकेक खांब मात्र आतून पोखरतो
स्तोत्रांचा आवाज वाढत जातो
सगळं सुरक्षित, सगळं मंगल आहे
डोलारा उभा तोवर आलबेल आहे
डोलारा कोसळण्यापूर्वी जमा होतील का,
धुकं झाडून टाकणारे लखलखीत किरण?
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
कविता - नदी हरवते शहरातून
नदी हरवते शहरातून
हळूहळू ओढेही बुजती
मोजती मासे घटका
दूषित पाणी अन् माती
सांडपाणी आणि कचरा
आवळती रोजच गळा
जन म्हणती माता-देवी
आणिली उतरती कळा
नदी हरवते शहरातून...
पक्ष्यांची घरटी होती
ती झाडे तोडली कोणी
एकेक प्रकल्पामागे
मुरतेच वेगळे पाणी
नदी हरवते शहरातून...
या सिमेंटी विकासाने
नित पारा चढता राही
का घटती घटती होते
त्या नदीतटी वनराई
नदी हरवते शहरातून..
बुधवार, ४ डिसेंबर, २०२४
कविता - Flowing In The River
How many rivers must die in this land
before we see their pain?
How many trees must we tear down
beneath the urban strain?
Yes, and how many fish must float lifeless
and birds fade in silent pain?
The answer, my friend, is flowing in the river
The answer is flowing in the river
How much concrete must devour riverbanks
before we are scorched in the heat?
How much garbage must choke up our streams
before we learn our defeat?
Yes, and how many rivers must decay to sewers
while all living beings we cheat?
The answer, my friend, is flowing in the river
The answer is flowing in the river
(A tribute to Bob Dylan by Prajakta)
रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४
कविता - अंगण
कधी चांदण्या मोजल्या
कधी रांगोळ्या मांडल्या
कधी आधार देऊन
वेली वर चढवल्या
कधी बट ओढे झाड
त्याला लटके रागवावे
घर बांधति त्या चोची
तास तास निरखावे
ऊन पिते मधुमाली
चढे लाली तिच्या गाली
पलीकडे रुसलेली
भली थोरली बकुळी
वारा झोंबतो चाफ्याला
मन भरून दरवळ
पारिजाताचे चांदणे
सांजवेळेला निर्मळ
विचारांचे दाट धुके
इथे पांगते पांगते
शांत शांत होई काळ
बीज मातीत निजते
शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४
कविता - हिमालय
नुकताच हिमालयाचा अभ्यासदौरा केला . त्यानिमित्त ... कविता म्हणावं की नाही, माहीत नाही. प्रेझेंटेशनच्या निमित्ताने ठरवून लिहिलेल्या ओळी आहेत .
हिमालय
विशाल देशा, शीतल देशा, खडकांच्या देशा
नाजुक देशा, घडीच्या देशा, हिमाच्याही देशा
देवदार आणि चीडाच्या सूचिपर्णी देशा
बुरांशाच्या, केशराच्या दळदारी देशा
सागरमाथा, धौलागिरीच्या भव्यशिखर देशा
गंगोत्री नि यमुनोत्रीच्या खळखळत्या देशा
हिमालय-दशा
भय इथले संपत नाही, एकेक हिमनदी आटते
कोसळती कडे-दरडी, मन थिजून थिजून जाते
तो चढत जाई पारा, एकेक जीव लोपतो
भव्य वनांचा संभार, क्षणाक्षणाला घटतो
प्रवाशांचे येती थवे, प्लास्टिकचे पेव फुटते
झाल्या उंच इमारती आणि नवनवे रस्ते
भय इथले संपत नाही, दूषित पाणी आणि माती
उत्तुंग हिमालयाला विकास-लाटा धडका देती
बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४
मत हवं? नद्या-झाडे-टेकड्या वाचवा
नदी प्रदूषण, वृक्षतोड आणि टेकड्या फोडणे ह्याबाबत राजकीय उमेदवारांना प्रश्न विचारायला हवे आणि नदी व झाडे हे निवडणुकीच्या जाहीरनाम्यातले महत्त्वाचे विषय असावेत अशी मागणी पुण्यातल्या काही सजग नागरिकांनी केलेली आहे. त्याबाबत लेख माझा लेख लोकसत्तेत आला आहे. प्रकाशित लेख इथे पाहता येईल. तोच इथे देत आहे.
नुकतीच दिल्लीतली एक बातमी वाचली. दिल्लीचे भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव ह्यांनी यमुनेच्या नदीपात्रात निषेध व्यक्त करण्यासाठी अंघोळ केली आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर पुरळ आले, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि शेवटी त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. मुंबईची मिठी किंवा पुण्याच्या मुळा-मुठेत तर उतरायची कुणी राजकीय व्यक्ती हिंमत करणेही अवघड वाटते. आपल्याकडे नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाली आहेत. “नाद करते” ती नदी, अशी नदी ह्या शब्दाची व्युत्पत्ती धरली जाते. पण आपल्या शहरांमधल्या नद्या नाद (आवाज) करणे सोडाच, धड वाहतही नाहीत. त्या मृत झालेल्या आहेत. त्या काळसर दिसतात. त्यावर घाण तरंगत असते आणि मिथेनचे बुडबुडे येत असतात. नदीच्या जवळ गेल्यास गलिच्छ वासाने मळमळू लागते. ह्या आणि अशा प्रश्नांचे गांभीर्य समजावे म्हणून पुण्यातले काही सजग आणि जबाबदार नागरिक नद्या, झाडे आणि टेकड्या हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा व्हावा असा प्रयत्न करत आहेत.
आपल्याकडे विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. कुणी जातीवर आधारित, कुणी धर्मावर आधारित तर कुणी आर्थिक लाभावर आधारित मतदान करतात. राजकीय पक्षही अशाच मुद्द्यांवर मते मागतात. पण आपण कुठल्याही जातीचे असू, कुठल्याही धर्माचे असू, गरीब असू की श्रीमंत; आपल्याला सगळ्यांना शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी लागणारच आहे. आपण सगळे श्वास घेणार आहोत, पाणी पिणार आहोत आणि इथल्या मातीतले अन्न खाणार आहोत. हवेचे, पाण्याचे आणि तापमानाचे आपल्या आयुष्यावर, आरोग्यावर आणि भविष्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. एवढेच नाही, तर आपल्या उत्पादनक्षमतेवर आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहेत. त्यामुळे “नद्या, झाडे वाचवा आणि खुर्ची मिळवा” अशी मागणी पुढे येते आहे. ही मागणी करणारे म्हणजे कुणी पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी आहेत किंवा पोट भरल्यामुळे नसते उद्योग सुचणारे लोक आहेत, असे मानायचे कारण नाही. तर ते सगळ्यांसारखेच श्वास घेणारे आणि पाणी पिणारे सामान्य नागरिक आहेत.
असेच काही नागरिक १० नोव्हेम्बरला पुण्यात औंधला मुळा नदीकाठी जमले होते आणि तिथे त्यांनी त्यांच्या मागण्या आणि जाहीरनामा सर्वांसमोर मांडला. पुण्यात फक्त ३०% सांडपाणी आणि मैल्यावर प्रक्रिया होते. बाकीचे तसेच नदीत सोडले जाते. २०१४ साली जपानच्या सहकार्याने जायका (JICA) प्रकल्प जाहीर झाला आणि ह्यात मुळा-मुठा स्वच्छ, मैलामुक्त होतील असे सांगण्यात आले. अद्यापही त्याचे काम रखडलेलेच आहे. कधी काळी हे काम पूर्ण झालेच तरी फक्त ६०% सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. हे काम मार्गी लावण्याऐवजी करदात्यांचे ४७०० कोटी खर्च करून पुण्यात नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प सुरू केलेला आहे. प्रत्यक्षात सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीकाठचा झाड-झाडोरा नष्ट करून पर्यावरणाचा विध्वंस चालू आहे. ह्यात पहिल्या एक किलोमीटरमध्येच हजारो झाडे कापली आहेत. संपूर्ण प्रकल्प दोन्ही काठ धरून ८८ किलोमीटरचा आहे. ह्यातून १५०० एकर नवीन जमीन तयार करणार आहेत आणि तिथे रेस्टॉरंट्स, वाहनतळ, फूडकोर्ट, जॉगिंग ट्रॅक इ. व्यावसायिक जागा बांधणार आहेत. आश्चर्य वाटेल, पण ह्या प्रकल्पासाठी जनाई मातेचे जुने मंदिर सुद्धा पाडलेले आहे! त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन “नदीकाठ सुशोभीकरण नको, नदी पुनरुज्जीवन हवे”, “व्होट फॉर रिव्हर्स” अशा घोषणा दिल्या. केवळ मतांसाठी नाही, तर आपल्या भविष्यासाठी राजकीय उमेदवारांनी नदीची जबाबदारी घ्यावी आणि नदीचे पालक व्हावे, अशा मागण्या केल्या. आपले मत नदीला आणि झाडांना, असे जाहीर करण्यात आले.
भाजपचे २०२४ विधानसभा संकल्पपत्र ह्या दृष्टीने वाचले. ६० पैकी ५४व्या पानावर वन, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधने असा विभाग येतो. जेमतेम २ पानांच्या विभागात मजकूर कमी आणि चित्रे जास्त आहेत. त्यात “एक पेड मां के नाम” अशा उपक्रमाचा उल्लेख आहे, पण जुनी झाडे वाचविण्याबद्दल काहीच म्हटलेले नाही. कांदळवन संरक्षणाचाही उल्लेख आहे. नद्या स्वच्छ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रो-बोट प्रणाली वापरण्यात येईल, असे म्हटले आहे. ह्या तंत्रज्ञानाने तरंगता कचरा, प्लास्टिक गोळा करता येते. परंतु नदीत सोडले जाणारे सांडपाणी आणि रासायनिक कचऱ्याबाबत काहीही म्हटलेले नाही. नदीच्या पात्राची धूप रोखण्यासाठी बांबू व व्हेटीवरसारख्या गवतांचा वापर करण्यात येईल, असे म्हटले आहे. आर्थिक तरतुदीचे किंवा अन्य कुठलेही आकडे दिलेले नाहीत.
महाविकास आघाडीच्या ४८ पानांच्या “महाराष्ट्रनामा”मध्ये तेराव्या पानावर शहरविकास अंतर्गत प्रदूषणमुक्त महाराष्ट्र, शाश्वत विकास, नेट झीरो, हवामान बदल, टेकड्या वाचविणे इ. उल्लेख येतात. त्यानंतर शाश्वत विकास उद्दिष्टांचा उल्लेख आहे. शहर-नगर विकास विभागात पान क्रमांक २५ वर “मैला पाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करणार आणि त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणार” असा उल्लेख आहे. मात्र नक्की आकडा दिलेला नाही. कर्बउत्सर्जन कमी करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग असेही उल्लेख आहेत. २७ क्रमांकाच्या पानावर नदीबाबत लिहिले आहे. सर्व झऱ्यांचे मॅपिंग केले जाईल, पाणीपट्टीतील ७०% रक्कम सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येईल आणि पहिल्या टप्प्यात १३१ शहरांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले जातील आणि अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण केले जातील; असे म्हटले आहे. त्यानंतर ३४ आणि ३५ पानांवर पर्यावरण विभाग आहे. त्यात पॅरिस करार, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त नद्या, नद्यांची रेड-ब्लू लाईन, जैवविविधता, शाश्वत विकास असे बरेच मुद्दे मांडलेले आहेत. ह्यात कुठलीही आकडेवारी दिलेली नाही.
राजकारणी लोक नुसते घोषणा करतात, प्रत्यक्ष काही होणार नाही किंवा शेवटी निवडणुकांचे निकाल अशा नदीसारख्या मुद्द्यांवर थोडीच ठरतात, यांसारखे प्रश्न अर्थातच उपस्थित होतात. पण सगळ्या गोष्टी अशा काळ्या-पांढऱ्या रंगात बघायच्या नसतात आणि ज्या लांब पल्ल्याच्या लढाया असतात, त्या तर नक्कीच अशा प्रकारे बघता येत नाहीत. प्रत्यक्ष मतदानावर लगेचच परिणाम होईल किंवा नाही होणार. पण जनतेने आपल्या मागण्या मांडणे महत्त्वाचे असते. आज प्रमुख पक्षांच्या जाहीरनाम्यात ‘पर्यावरण’ असा विभाग आला आहे, त्यांना तो घ्यावा लागला आहे. काही नेते आणि पक्ष ह्या विषयावर जाहीर भूमिका घेऊ लागले आहेत, लोकांशी चर्चा करू लागले आहेत. शेकडो मतदार या मुद्द्यावर आपले मत ठरविणार आहेत. जाहीरनाम्यात जे विषय येतात, त्यांचे महत्त्व अधोरेखित होते, त्यावर प्रश्न विचारता येतात, त्याबद्दल जबाबदार धरता येते. पुढची धोरणे ठरविण्यासाठी आणि आर्थिक तरतुदी करण्यासाठी एक दिशा ठरते. म्हणूनच आपण जास्तीत जास्त संख्येने पर्यावरणासारखे महत्त्वाचे मुद्दे ऐरणीवर आणले पाहिजेत. शेवटी हजार मैलांचा प्रवास एका पावलानेच सुरू होतो.
-प्राजक्ता महाजन






